सोमवारपासून शाळा सुरू होणार? वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती

WhatsApp Group

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयावरुन विद्यार्थी आणि पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. विद्यार्थी पालकांसह शिक्षकांकडून देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी पालकांसह शिक्षकांनीही सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. नियोजन करून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी शिक्षकांकडून केली जातं आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्याबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती सांगितली आहे.

वर्षा गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, शिक्षणतज्ज्ञ आणि पालक संघटनांशी चर्चा झाली त्यावेळी आम्हाला निवेदन प्राप्त झाली आहेत. त्या निवेदनांमध्ये शाळा सुरू कराव्या असं सर्वांचं म्हणणं होतं. पण मधल्या काळात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाली त्यामुळे राज्य सरकारने शाळा आणि महाविद्यालये सुरू करू नये असा निर्णय घेतला.

मात्र आता तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या भागांत रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला आहे. त्यानुसार आम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव देखील सादर केला आहे. येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत विचार करावा असं प्रस्तावात सांगण्यात आले आहे.

स्थानिक पातळीवर आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनाकडे आम्ही फाईल पाठवली असून मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय देतील. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिली.