नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्यांकडून दुसरी अपेक्षा नाही

WhatsApp Group

नागपूर : हिवाळी अधिवेशन सुरू असताना सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ 200 विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. यावरून अजित पवार, पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असे विधान करत टीकेचे धनी ठरले आहेत. या धक्कादायक वक्तव्यामुळे अजित पवार समाजमाध्यमांवर ट्रोल होऊ लागले आहेत. पीएच.डी. करणा-या विद्यार्थ्यांमधून अजित पवारांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनीही अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्यांकडून दुसरी अपेक्षा करू शकत नाही, असा हल्लाबोल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केला. तर अजित पवारांच्या वक्तव्यावरून सरकार शिक्षणाविरोधात असल्याचे दिसते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. अजित पवारांनी पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांची थट्टा करू नये, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

मनोज आखरे म्हणाले, हे असंवेदनशील सरकार आहे. शिक्षणाबद्दल अनास्था दिसून येते, पीएच.डी. करून केवळ नोकरी मिळत नसते तर संशोधन करण्यात येते. देशात केवळ ०.५ टक्के विद्यार्थी पीएच.डी. होतात. सारथीसाठी दिलेल्या जाहिरातीत पात्र विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्यात येईल असा कुठेही उल्लेख नव्हता. त्याविरोधात ४५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. जाहिरातीनुसार पात्र विद्यार्थ्यांना फेलोशिप प्रदान करावी. अजित पवार यांनी काल विधानसभेत केलेल्या वक्तव्याचा शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.