विद्यापीठांनी देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

WhatsApp Group

मुंबई : एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी. यामुळे शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण होईलअसे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले. आज एचएसएनसी समूह विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ एचएसएनसी विद्यापीठरमा सुंदरी वाटूमल सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी पद्मश्री ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरविद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानीएचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीशमाजी अध्यक्ष किशु मानसुखानी व कुलगुरु डॉ हेमलता बागला आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले कीअध्यात्मावर आधारित आपल्या देशाची संस्कृती महान आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. आपली शिक्षण पद्धती ही आदर्श असून अनेक देशांनी तिचा स्वीकारही केला आहे. ज्याप्रमाणे आज योगाभ्यास शिकण्यासाठी अनेक देशातील नागरिक आपल्या देशात येत आहेत त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही इतर देशातील नागरिक आपल्या देशाला नक्कीच प्राधान्य देत आहे. तसेच विद्यापीठांनी रोजगारक्षम तरूण पिढी घडवावी, अशी आशाही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

आपल्या देशातील मातृशक्ती महान असून महिलांना नेहमीच सर्वेच्च स्थान दिले आहे. आज आपल्या देशातील महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. आज आयएएस परिक्षा पास होणाऱ्या यादीत पहिल्या तीन महिला आहेत. तसेच या विद्यापीठात विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करतानाही मुलींची संख्या जास्त आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कोणतेही काम छोटे किंवा मोठे नाही नोकरी किंवा व्यवसाय करताना प्रामाणिकपणे कष्ट केल्याने यश नक्की मिळते. या तत्वाचा अवलंब करून समाजासमोर आदर्श निर्माण करावाअसेही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले.