
मुंबई – एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा (mva government) जोरदार सत्तासंघर्ष सुरु असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले होते. शिवसेनेकडून बहुमत चाचणीबाबत सुप्रीम कोर्टात याचिक दाखल केली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकारला उद्या ३० जूनलाच बहुमत चाचणीला समोरं जावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने बहुुमत चाचणीची स्थगिती रोखली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
22 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. यावेळीच ते राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यांना कायदेशीर बाबी करण्यात रस नव्हता. मात्र शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यापासून रोखलं होतं. आजही कॅबिनेट बैठकीपूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यांमध्ये फोनवरुन संभाषण झालं होतं. त्यामुळे कॅबिनेट बैठकीनंतर ठाकरे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला.
अनेकांनी उद्धव ठाकरेंना कोणताही मोठा निर्णय घेऊ नका असं सांगितलं होतं. मात्र पक्षात फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते. आज सकाळी त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेंच्या गटाला मानसिक आवाहन करणारं पत्रही लिहिलं होतं. यात त्यांनी सर्व शिवसैनिकांनी परता या असं नमूद केलं होतं.