
नाशिक: नागरिकांना व विद्यार्थ्यांना विविध कामांसाठीचे लागणारे आवश्यक दाखले व सेवा एकाच छताखाली ‘शासन आपल्या दारी’ शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. या कामांसाठी त्यांना लागणारे परिश्रम व वेळ वाचून खऱ्या अर्थाने ही वंचितांची सेवा घडतेय, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
आज नाशिक तहसिल कार्यालयाच्या वतीने शिंदे गावात महाराजस्व अभियांनांतर्गत ‘शासन आपल्या दारी’आयोजित शिबिरात मंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, सहायक जिल्हाधिकारी जतीन रहेमान, तहसलिदार अनिल दौंडे, तालुका गटविकास अधिकारी सारिका बारी, कृषी अधिकारी रवींद्र वाघ, शिंदे गावाचे सरपंच गोरख जाधव, उपसरपंच अनिता तुंगार यांच्यासह महसूल विभागाचे व विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, नागरिक व विद्यार्थी यांना शैक्षणिक दाखले, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, आधिवास प्रमाणपत्र, पॅनकार्ड असे अनेक दाखले व सेवा प्राप्त करून घेण्यासाठी विविध कार्यालयांना जावे लागते व अंनत अडचणी येत असतात. परंतु आज या आयोजित शिबीरीच्या माध्यमातून सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व अधिकारी येथे उपस्थित आहेत व जागेवरच सर्व सेवा व सुविधा नागरिकांना मिळणार आहे. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आज रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सुद्धा अनेक बेरोजगार युवक-युवतींना नियुक्तीपत्र देण्यात आहे आहेत. असे उपक्रम राज्यभर राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.