
मुंबई – शिवसेनेने त्यांचा गटनेता बदलला आहे. उद्या बहुमत चाचणीवेळी व्हिप जारी होईल मग हे प्रकरण कोर्टामध्ये आहे. एका रात्रीत राज्यपाल भवनाने बहुमत चाचणीसाठी पत्र दिले. ११ जुलैपर्यंत कोर्टाने म्हणणं मांडण्याची मुदत दिली आहे. मग ४८ तासात बहुमत चाचणी का? हा चमत्कार आहे. लोकशाही, संविधानविरोधी काम राजभवनाकडून केलं जातं असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, शिवसेना कोर्टात गेली आहे. तीच भूमिका काँग्रेसची देखील आहे. सध्या आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. ज्याच्याजवळ बहुमत असेल त्यांचा मुख्यमंत्री होईल. राज्यपाल भाजपाचा अजेंडा महाराष्ट्रात राबवत आहेत. शिवसेनेचा गटनेता वेगळा आहे. हे बंडखोर गटाला मान्य नाही. विधानसभा हा आखाडा नाही. सुप्रीम कोर्टाने ११ जुलैपर्यंत वेळ दिलीय. वाट न बघता मध्येच ही चाचणी घेणे कुठल्या संविधानिक चौकटीत येते याचं उत्तर मिळणं गरजेचे आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून धीर दिला. आम्ही सोबत आहोत, घाबरण्यासारखं काही नाही. वेळ आल्यास तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ असेही त्यांनी सांगितले आहे. शिवसेनेत स्थिरता राहावी असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. बंडखोर आमदार अजूनही आम्ही शिवसेनेचे आहोत असं सांगतायेत. शिवसेनेचे आमदार सभागृहात आल्यानंतर भूमिका बदलू शकते. ही अग्निपरीक्षा बंडखोर आमदारांची आहे असं नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले.