आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिराच्या प्रसादाच्या पाकिटात चक्क एक लहान गोगलगाय आढळल्याचा दावा एका दाम्पत्याने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
नेमकी घटना काय आणि व्हिडिओमध्ये काय?
सिम्हाचलम येथील या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका दाम्पत्याने ‘पुलिहोरा’ (चिंचेचा भात) प्रसादाचे पाकीट घेतले होते. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, भाताच्या पाकिटात एक लहान जिवंत गोगलगाय असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दाम्पत्याचा असा आरोप आहे की, जेव्हा त्यांनी ही बाब मंदिर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, तेव्हा कर्मचाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता किंवा माफी न मागता केवळ पाकीट परत घेतले. या उदासीनतेमुळे त्यांनी हा प्रकार जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला.
A disturbing incident has been reported at the Simhachalam temple, where a snail was found in the prasadam. Devotees were shocked and hurt, as prasadam is considered sacred and must be prepared and served with utmost care and cleanliness.
The coalition government has failed to… pic.twitter.com/KUprxujVxK— YSR Congress Party (@YSRCParty) December 30, 2025
मंदिर प्रशासनाचा ‘बदनामीचा’ दावा
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर प्रशासनाने बचावात्मक भूमिका घेतली आहे. मंदिराच्या कार्यकारी अधिकारी (EO) एन. सुजाता यांनी हा सर्व प्रकार मंदिराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, मंदिराचे स्वयंपाकघर पूर्णपणे स्वयंचलित (Automated) असून तिथे स्वच्छता आणि गुणवत्तेची अत्यंत कडक काळजी घेतली जाते. ज्या दिवशी हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे, त्या दिवशी जवळपास १५,००० पाकिटांचे वाटप करण्यात आले होते, मात्र इतर एकाही भाविकाने अशी तक्रार केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस तपास आणि राजकीय पडसाद
मंदिर प्रशासनाने या प्रकरणाची अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. पोलीस आता स्वयंपाकघरातील सीसीटीव्ही फुटेज, यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेत आहेत. दुसरीकडे, या मुद्द्यावरून राजकारणही तापू लागले आहे. विरोधी पक्षांनी मंदिर प्रशासनावर टीका करताना म्हटले आहे की, भाविकांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी प्रशासनाने प्रसादाच्या गुणवत्तेवर लक्ष द्यायला हवे. प्रसादासारख्या पवित्र गोष्टीमध्ये असा निष्काळजीपणा हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
