
मुंबई – तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव आता वाढू लागले आहेत. फरसबीसह वाटाण्याचे दर प्रतिकिलो शंभरच्या पुढे गेले असून टोमॅटो, कारलीचे दरही वाढले आहेत. गवारचे दर मात्र नियंत्रणात आले असल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना भाजीपाल्याच्या दरामध्ये झालेली वाढ सामान्यांचा खिसा रिकामा करीत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ५९२ ट्रक व टेम्पोमधून २७१८ टन भाजीपाल्याची आवक झाली असून, जवळपास ५ लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये फरसबी ४० ते ६० रुपये किलो दराने विकले जात होते, त्याचे दर ६० ते १०० रुपये झाले आहेत.
किरकोळ मार्केटमध्ये फरसबी १२० रुपये किलो झाली आहे. वाटाणाही किरकोळ मार्केटमध्ये १०० रुपये किलो दराने विकला जात आहे. गवारचे दर ६० ते ८० वरून ३० ते ६० रुपयांवर आले आहेत. तर भेंडीचे दरही नियंत्रणात आहेत. तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागल्यामुळे दर वाढत आहेत. गवार व इतर काही भाज्यांची आवक जास्त असल्यामुळे त्यांचे दर कमी झाले आहेत.