परतीच्या पावसामुळे कोकणात दाणादाण; भात कापणीत पावसाचा अडथळा

WhatsApp Group

सिंधुदुर्ग : कोकणामध्ये(Konkan) सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, या जिल्ह्यात यावर्षी जवळपास 2 लाख 25 हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली आहे. दसऱ्यानंतर कोकणामध्ये भात (Rice) कापणीला सुरुवात केली जाते. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणीला अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी भात पडून आहे. त्यावर पाऊस पडत असल्यामुळे भाताला कोंब आले आहेत. त्यामुळे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

कोकणात भाताला शेतकऱ्याचं पिवळं सोन असं म्हटलं जातं. मात्र गेल्या चार महिन्यापासून कष्टाने पिकवलेलं भात पीक आता वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकरी चिंतेत आला आहे. कोकणात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे भात पीक आडवं झालं आहे. भाताला आता कोंब आल्यामुळे ते भात निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या भाताचा काही उपयोग होणार नसल्यामुळे वर्षभर आता उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

परतीच्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलाच आहे त्यासोबत जीवितहानी झाल्याची घटनाही सिंधुदुर्गात घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामधील सांगेली गावात अंगावर वीज कोसळून हनुमंत झोरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल (11 ऑक्टोबर) सकाळच्या दरम्यान घडली. हनुमंत लघुशंकेसाठी बाहेर गेला होता. त्यावेळी या युवकावर वीज कोसळली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.