
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या स्मृतीला अभिवादन करत खास पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरे यांनी या पोस्ट मध्ये त्यांनी लोकशाहीचे वारे वाहत असलेल्या जगात आपल्या राजघरणाबद्दल ब्रिटीशांमध्ये आणि जगाचे देखील कुतुहल टिकवले आणि 70 वर्ष राजमुकूट सांभाळताना आलेल्या कठीण प्रसंगांचा देखील दाखला दिला आहे.
राज ठाकरे यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. 70 वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही 70 वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची 70 वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोयातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ 2 ह्यांच्यामुळे.
#QueenElizabethII pic.twitter.com/RrZoCsTK3P
— Raj Thackeray (@RajThackeray) September 9, 2022
ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मागरिट थैचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं.
कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण 70 वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ 2 ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ 2 ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल. असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.