गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार – मंत्री दादाजी भुसे

WhatsApp Group

मुंबई : राज्याच्या विकासात व आर्थिक प्रगतीत बंदरे क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा असून या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहन देवून राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

बंदरे विकास धोरण संदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सभागृह येथे लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी दादाजी भुसे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार आदिती तटकरे, आमदार नितेश राणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार वैभव नाईक, आमदार शांताराम मोरे, आमदार प्रकाश सुर्वे तसेच बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, बंदरे विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, मुख्य बंदर अधिकारी कॅ. संजय शर्मा आदी उपस्थित होते.

मंत्री दादाजी भुसे यांनी मच्छिमार संघटना, प्रवासी जल वाहतूक संघटना तसेच खासगी पोर्ट संचालक यांच्याशी संवाद साधला व नव्याने तयार करण्यात येत असलेल्या धोरणासंदर्भात मांडण्यात आलेल्या सूचना जाणून घेतल्या.

बंदरे व खनिकर्म मंत्री श्री. भुसे म्हणाले, बंदरांच्या विकासामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. जागतिक स्तरावरही बंदरे विकास क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. बंदरे विकास क्षेत्रात महाराष्ट्रात मोठ्या संधी आणि क्षमता आहेत. या क्षेत्रातील उद्योग समूहांनी गुंतवणूकीसाठी पुढे यावे, असे आवाहन दादाजी भुसे यांनी केले.