हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी ‘निर्भय बनो’ : निखिल वागळे

WhatsApp Group

आज सांगली येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी संवाद साधला. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वेबसाईटने एक लाख वाचकांचा टप्पा पार केल्याच्या फलकाचे अनावरण तसेच अंनिस वार्तापत्र च्या मे २०२३ अंकाचे प्रकाशन वागळे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी निखिल वागळे आपल्या मनोगतात म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आपल्या मध्ये निर्भयता असणे गरजेची असते म्हणून अंनिसच्या ब्रीदवाक्य ‘विज्ञान निर्भयता नीती’ आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्कूटर वर ‘निर्भय बनो- म.गांधी’ असे लिहिले होते. महात्मा गांधीनी चंपारण्य सत्याग्रही वेळी निर्भय बनो चा नारा दिला होता. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या वेळी पुन्हा याचा पुनरुच्चार केला. आज भारतीय संविधानात निर्भय बनो हे तत्त्व आहे.

आपल्या मनोगतात वागळे पुढे म्हणाले की, २०१४ सालापासून देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.आपले धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र धर्माधारीत राष्ट्र करण्याचा मनसुबा आहे. हुकुमशाहीचा मुकाबला करण्यासाठी आम्ही ‘निर्भय बनो’ हे अभियान सुरू केले आहे. यामध्ये आम्ही फुले शाहू आंबेडकर यांचा विचार लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत.

पत्रकार निखिल वागळे म्हणाले की, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्याचं कार्य पुढे नेले, वाढवलं आहे, दाभोलकरांचे कार्य टिकवणे ही आपली जबाबदारी आहे, त्यासाठी मी अंनिस साठी महिन्यातील एक दिवस देणार आहे.

कार्यक्रमांचे प्रास्ताविक फारुक गवंडी, स्वागत राहुल थोरात तर आभार वाघेश साळुंखे यांनी मांडले.या कार्यक्रमाला डॉ. प्रदीप पाटील, डॉ. संजय निटवे, डॉ. सविता अक्कोळे, गीता ठाकर, जगदीश काबरे, सुजाता म्हेत्रे, स्वाती वंजाळे, आशा धनाले, अमर खोत, संजय कोले,निलम मागावे, अमित शिंदे, प्रविण शिंदे उपस्थित होते.