दर्जेदार शिक्षणाचे केंद्र नागपूर विद्यापीठ व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

WhatsApp Group

नागपूर : देशाच्या हृदयस्थानी असणाऱ्या नागपूर विद्यापीठाने आपल्या दिप्यमान इतिहासात अनेक महापुरुषांना, महान व्यक्तिमत्त्वांना घडविले आहे. यापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची ओळख दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून सर्वत्र व्हावी, अशा शुभेच्छा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे दिल्या.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवाचे आज गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात उद्घाटन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिध्द वैज्ञानिक, होमी बाबा राष्ट्रीय संस्थेचे कुलपती अनिल काकोडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी प्र कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव राजू हिवसे उपस्थित होते.

भारताच्या हृदयस्थानी असणाऱ्या नागपूर शहरांमध्ये नागपूर विद्यापीठाची स्थापना शंभर वर्षांपूर्वी 4 ऑगस्ट 1923 मध्ये झाली. या विद्यापीठातून देशाच्या विकासात हातभार लावणारे मान्यवर पुढे आले आहेत. त्या विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळ्याला भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात उपस्थित राहिल्याचे समाधान असल्याचे यावेळी राज्यपालांनी सांगितले.

100 वर्ष एखादी संस्था विद्यादानाचे काम करते हे अतिशय प्रेरणादायी आहे. या भूतकाळातून नव्या भविष्याचा आराखडा आम्हाला तयार करायचा आहे. या विद्यापीठातून देशाचा गौरव वाढवणारे नामवंत तयार झाले आहेत. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असणारे रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला घडविणारे हे ज्ञानपीठ आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख त्यांनी केलेल्या दर्जेदार महामार्गांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात झाली असल्याचे आवर्जून सांगितले. नागपूरचे गडकरी हे रोडकरी आहेत, असे सन्मानाने देशभरात म्हटले जाते. आपल्या शहराची ओळख त्या ठिकाणच्या संस्था, त्या ठिकाणचे व्यक्तिमत्व तयार करीत असते. त्यामुळेच नागपूर विद्यापीठ हे दर्जेदार शिक्षणाचे केंद्र कायम राहील याकडे जागृतपणे लक्ष ठेवा, तसे प्रयत्न करा,असे आवाहन त्यांनी केले.

देशाच्या अन्य प्रांतांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यापीठाची नावे संतांच्या नावाने असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आपण प्रयाग मध्ये प्रत्यक्ष ऐकले होते. राष्ट्रसंतांच्या ‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे’ या गीताचा उल्लेख करून संतांच्या दूरदृष्टीने कर्तुत्ववान पिढी निर्माण करण्याचे कार्य विद्यापीठाने करावे, आज शतकोत्तर कार्यक्रमांचा शुभारंभ होताना हा संकल्प करूया, असे आवाहनही त्यांनी केले.