
IPL 2025 Qualifier 2: आयपीएलच्या 18व्या मोसमात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आपली विजयी परंपरा कायम राखत क्वालिफायर-2 मध्ये धडक दिली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध दमदार विजय मिळवत त्यांनी अंतिम फेरीच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. आता पुढील टप्प्यात मुंबईसमोर पंजाब किंग्सचं आव्हान असणार आहे. हा निर्णायक सामना 1 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार आहे.
या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध ट्रॉफीसाठी लढणार आहे. त्यामुळे ‘करो या मरो’ अशा या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे.
मुंबई इंडियन्सची क्वालिफायर-2 मधील कामगिरी
मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमधील अनुभव फार समृद्ध आहे. 2011 पासून सुरू झालेल्या क्वालिफायर-2 सामन्यांमध्ये मुंबईने आतापर्यंत चार वेळा सहभाग घेतला असून त्यापैकी दोन वेळा विजय मिळवला आहे.
2011: पहिल्यांदा क्वालिफायर-2 मध्ये मुंबईने सहभाग घेतला. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 43 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
2013: राजस्थान रॉयल्सवर 4 विकेट्सने विजय मिळवत मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केला आणि नंतर चेन्नई सुपर किंग्सवर मात करत आपली दुसरी ट्रॉफी जिंकली.
2017: कोलकाता नाईट रायडर्सवर 6 विकेट्सने मात करत फायनलमध्ये धडक मारली. अंतिम सामन्यात रायजिंग पुणे सुपर जायंट्सला 1 धावेने हरवत मुंबईने चिरकाल लक्षात राहणारा विजय मिळवला.
2023: गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायर-2 मध्ये खेळताना मुंबईला 62 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
पाचव्यांदा क्वालिफायर-2
मुंबई इंडियन्ससाठी ही पाचवी वेळ आहे की जेव्हा ते क्वालिफायर-2 मध्ये खेळत आहेत. या सामन्यात त्यांच्यासमोर पंजाब किंग्सचं मोठं आव्हान आहे. विशेष म्हणजे, साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात पंजाबने मुंबईचा पराभव केला होता. त्यामुळे या पराभवाचा बदला घेऊन मुंबई फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल.
आतापर्यंत क्वालिफायर-2 जिंकलेले दोन्ही हंगाम मुंबईने शेवटी ट्रॉफी जिंकून संपवले आहेत. त्यामुळे यंदाही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, याकडे साऱ्या चाहत्यांचं लक्ष लागले आहे.
मुंबई इंडियन्ससाठी हा सामना केवळ अंतिम फेरीचं तिकीट नाही, तर आपली प्रतिष्ठा आणि यशस्वी परंपरा टिकवण्याची संधी आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात नवसंजीवनी मिळालेल्या या संघाला तिसऱ्यांदा क्वालिफायर-2 जिंकून फायनलमध्ये प्रवेश करता येतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.