
मुंबई : राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे. मनसे भाजप किंवा शिंदे गट शिवसेनेसोबत युती करणार नाही. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी आज (14 सप्टेंबर, बुधवार) ही घोषणा केली. राज ठाकरेंच्या या ‘एकला चलो रे’च्या हाकेने भाजप आणि शिंदे गटातील युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. BMC निवडणुकीत मनसे 227 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. केवळ बीएमसीच नाही तर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे राज्यभरातील आगामी सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार आहे.
मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले की, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील सर्व महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, राज ठाकरे लवकरच विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.