
मुंबई – कच्च्या तेलाचा कमी होत चाललेला साठा, इंधन खरेदीसाठीचे परावलंबित्व आणि वाढते तापमान या सर्व पार्श्वभूमीवर इंधन बचत ही काळाची गरज बनली असून इंधनाचा वापर काटकसरीने करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने सक्षम-२०२२ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीराम भावसार, भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक पी. के. रामनाथन, ओ ॲन्ड एम गेलचे कार्यकारी संचालक शालिग्राम मोवर, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) चे पश्चिम विभागाचे संचालक शशिकांत पाटील, प्रादेशिक संचालक अजित धाक्रस, इंडियन ऑइल सीजीएम सुब्रात कार, हिंदुस्तान पेट्रोलियमचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण राव,राज्य समन्वय संतोष निवेंदकर यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सक्षम महोत्सवाअंतर्गत इंधन बचतीचे जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.या उपक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीला इंधन बचतीचे महत्त्व कळेल. आज जागतिक पातळीवर इंधनामुळे युध्द होत आहेत. याचे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहेत. त्यामुळे इंधन बचतीच्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.