उपमुख्यमंत्रीच छुपे मुख्यमंत्री आहेत का? शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांचा सवाल

WhatsApp Group

मुंबई : मंत्रालयात दोन वॉररूम स्थापन करण्यावरून शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्कूटर सरकार असून त्यांचं आपसातच युद्ध सुरू आहे का? असा सवालही मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेयर करत ही टीका केली आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार राज्यात जेव्हा होतं, त्यावेळी विरोधक असलेल्या भाजपने या सरकारला तीन चाकांचं रिक्षा सरकार म्हणून हिणवलं. पण आता राज्यात दोन चाकाचं स्कूटर सरकार आल्याचे म्हणत मनिषा कायंदे यांनी खोचक टोला लगावला आहे.

या स्कूटर सरकारमध्ये मंत्रालयात दोन वॉररुम स्थापन केल्या आहेत. एक मुख्यमंत्र्यांची आणि दुसरी उपमुख्यमंत्र्यांची आहे, म्हणजे वरवर सर्व काही चांगलं चाललंय, ‘एक दुजे के लिए’ चाललंय, असं जे दाखवलं जातं आहे ते खरंच तसं आहे का? की उपमुख्यमंत्रीच छुपे मुख्यमंत्री आहेत? हा प्रश्न पडतो. असंही कायंदे यावेळी म्हणाल्या.