गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (नेस्को) येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक २०२५ अंतर्गत ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये २ लाख २० हजार कोटींच्या ट्रान्सफॉर्मेटिव इनिशिएटिव फॉर शिपिंग अँड शिपबिल्डिंगचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून इंडिया मेरीटाईम वीक २०२५ मध्ये चांगल्या प्रकारे विचार मंथन होत आहे. या माध्यमातून सागरी उद्योग आणि व्यापारातील नवतंत्रज्ञान जगापर्यंत पोहचविण्याचे काम झाले आहे. इंडिया मेरीटाईम वीक २०२५ महाराष्ट्रासाठी फलदायी ठरले असून यामध्ये महाराष्ट्राने विविध देशांसोबत ५६ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत.
त्यामध्ये जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, पुनर्वापर, बंदर उभारणे, विकास, क्षमतावाढ यासह सागरी उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या दृष्टीने कौशल्य विकास या विषयांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरण आणि दूरदृष्टीमुळे देशाच्या सागरी क्षेत्राचा मोठा विकास झाला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्टची क्षमतावाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हे बंदर आज देशातील सर्वात मोठे कंटेनर हँडलिंग पोर्ट म्हणून ओळखले जात आहे.
तर वाढवणसारखे जागतिक दर्जाचे बंदर महाराष्ट्रात उभारले जात आहे. यामुळे महाराष्ट्राची जागतिक ओळख निर्माण झाली आहे. सागरी उद्योग आणि व्यापारक्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारत हा जागतिक केंद्र आहे. महाराष्ट्रात या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जागतिक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
