बिहारमधील कटिहार जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी काळाने भीषण घाला घातला. राष्ट्रीय महामार्ग ३१ वर बस, ट्रक आणि पिकअप व्हॅन यांच्यात झालेल्या तिहेरी भीषण अपघातात १० भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसगाडा चौक येथे हा थरार घडला. अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की पिकअप व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून महामार्गावर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.
देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेले सर्व लोक पूर्णिया जिल्ह्यातील शोभा परिसरातील रहिवासी होते. हे सर्वजण आदिवासी समाजातील असून झारखंडमधील देवघर येथे धार्मिक विधी आणि पूजा-अर्चा करून पिकअप व्हॅनने मायदेशी परतत होते. सुमारे २५ जणांचा हा गट आनंदाने घरी परतत असताना गेडाबाडीजवळ काळाने त्यांच्यावर झडप घातली. या अपघातात आतापर्यंत १० जणांनी प्राण गमावले असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
बिहार | कटिहार पुलिस- “आज, 11 अप्रैल, 2026 को कटिहार जिले के कोरहा पुलिस स्टेशन के इलाके में गेराबारी के पास एक भयानक सड़क हादसा हुआ, जिसमें एक बस और एक पिकअप गाड़ी के बीच टक्कर हो गई। इस हादसे में अब तक 10 लोगों की मौत हो चुकी है। हादसे में घायल हुए लगभग 25 लोगों को फर्स्ट एड के… pic.twitter.com/koEDhDoiFt
— ANI_HindiNews (@AHindinews) April 11, 2026
मद्यधुंद चालकाचा निष्काळजीपणा नडला?
स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेल्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. तो अतिशय वेगाने आणि बेदरकारपणे बस चालवत होता, ज्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि ही भीषण धडक झाली. कटिहारचे पोलीस अधीक्षक शिखर चौधरी यांनी अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला असून चालक नशेत होता का, या कोनातून तपास सुरू असल्याचे सांगितले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पूर्णिया मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे.
प्रशासकीय मदत
या हृदयद्रावक घटनेनंतर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारे पीडित कुटुंबांप्रती संवेदना प्रकट करत प्रशासनाला जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. “वेगावर नियंत्रण ठेवा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करा,” असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे. सध्या पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
