IPL 2025: मुंबईकडून 20 धावांनी पराभव; गुजरातचा आयपीएल 2025 मधील प्रवास संपुष्टात, गिल म्हणाला…

WhatsApp Group

आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. ३० मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत २२८ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने चिवट झुंज दिली, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि त्यांचा मोसम याच सामन्यात संपुष्टात आला. सामन्यानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने स्पष्टपणे आपल्या नाराजीचा सूर लावत पराभवामागील महत्त्वाची कारणे सांगितली.

सामना संपल्यानंतर बोलताना शुभमन गिल म्हणाला, शेवटच्या तीन-चार षटकांमध्ये आम्ही सामना हातातून घालवला. सामन्याची स्थिती आमच्या नियंत्रणात होती, पण काही निर्णय चुकीचे ठरले. पॉवरप्लेमध्ये तीन महत्त्वाच्या विकेट्स गेल्यामुळे दबाव आला. अशा स्थितीत सामन्यात टिकून राहणे कठीण होते. आमच्याकडून काही चुका झाल्या, पण साई सुदर्शनसारख्या फलंदाजाचा खेळ पाहून अभिमान वाटतो.

गिलने गोलंदाजांच्या कामगिरीबाबतही मत व्यक्त केले. तो म्हणाला, गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी फारशी अनुकूल नव्हती. २१० चा स्कोअर या मैदानावर बरोबरीचा मानला जातो, पण आम्ही २२८ धावा दिल्या. त्यामुळे आम्हाला धावांचा पाठलाग करताना अधिक आक्रमकता दाखवावी लागली.

आक्रमक फलंदाजी

मुंबई इंडियन्सकडून फलंदाजांनी अफाट कामगिरी करत गुजरातच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. रोहित शर्माने ५० चेंडूत ८१ धावा करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. जॉनी बेअरस्टोने २२ चेंडूत ४७ धावा फटकावत वेगवान खेळी केली. सूर्यकुमार यादव (२० चेंडू, ३३ धावा) आणि हार्दिक पंड्या (९ चेंडू, २२ धावा) यांनी शेवटच्या टप्प्यात झंझावाती खेळी करत संघाचा स्कोअर २० षटकांत २२८ पर्यंत नेला.

गुजरातची झुंज अपुरी

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला खराब सुरुवात मिळाली. कर्णधार शुभमन गिल फक्त २ चेंडूत १ धाव करून माघारी परतला. मात्र, साई सुदर्शनने जबरदस्त फलंदाजी करत ४९ चेंडूत ८० धावांची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरनेही २४ चेंडूत ४८ धावा करत गुजरातला काहीशी आशा दिली. पण मधल्या फळीत सातत्याचा अभाव आणि विकेट्सचा पडलेला मारा यामुळे गुजरातला २० षटकांत २०८ धावांपर्यंतच मजल मारता आली.

गिलने दिला पुढील हंगामासाठी दिला संदेश

शुभमन गिलने पराभवाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या सकारात्मक बाजूंचाही उल्लेख केला. तो म्हणाला, “शेवटचे दोन-तीन सामने आमच्या हातातून गेले. पण साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारखे खेळाडू पुढच्या मोसमासाठी आशादायक आहेत. हा हंगाम शिकवण देणारा होता.