शेतकरी महिला भगिनींचे देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात अमूल्य योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group

मुंबई: शेतात राबणाऱ्या आपल्या महिला भगिनी राज्य आणि पर्यायाने देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात अमूल्य असे योगदान देत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी भगिनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अग्रेसर आहेत. महिलांच्या याच योगदानाबाबत आणि महाराष्ट्रातील ‘माविम’च्या कामाची माहिती देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लेख जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड इकॉनॉमी फोरमने प्रकाशित केला आहे. जागतिक आर्थिक परिषदेने ‘माविम’च्या वाटचालीची दखल घेत, परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लेखाला स्थान देणे ही बाब महत्वपूर्ण ठरली आहे.

महाराष्ट्र शासन शेतकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहे. ‘एआय-फॉर – एआय (AI4AI)’ म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर ॲग्रीकल्चरल इनोव्हेशन” या जागतिक आर्थिक परिषदेच्या धोरणाबरहुकूम पावले टाकत आहे. शेती, शेतमाल आणि बाजारपेठेशी संबंधित मूल्य साखळीत या महिलांचे स्थान बळकट व्हावे, यासाठी माविम प्रयत्नशील असल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘माविम’ सुमारे दीड लाख महिला बचतगटांच्या माध्यमातून असे ३६१ संघ स्थापन करून त्यांना शेतीमाल उत्पादन आणि बाजारपेठेशी जोडण्यात येणार आहेत.

माविम जागतिक आर्थिक परिषदेच्या (वर्ल्ड इकॉनॉमी फोरम) च्या मदतीने या शेतकरी महिलांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. फार्म-टू-मार्केट या व्यासपीठाद्वारे मूल्य साखळीमध्ये महत्वपूर्ण असे परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच ‘माविम’ ॲग्रिटेक क्षेत्रातील डीजिटल ॲग्रीकल्चरल फ्रेमवर्क प्रत्यक्षात आणणार आहे. यामध्ये बारा खासगी कंपन्याही सहभागी होणार आहेत, याबाबतही मुख्यमंत्र्यांनी या लेखात सुतोवाच केले आहे.. महाराष्ट्राचे माविमच्या माध्यमातून सुरु टाकलेले हे पाऊल अन्य राज्यांसाठी दीपस्तंभासारखे राहील. त्यातून शेतकरी महिला भगिनींची प्रगती, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच्या प्रयत्नामध्ये भर पडणार आहे. या अनुषंगाने या लेखात माहिती देण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील महिलांना जमीन, तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा उपलब्ध करून दिल्यास जगभरातील कृषी उत्पन्नात आणि अन्न सुरक्षा यामध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ होणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबाबत भाष्य केले आहे.