कौतुकास्पद! वनडे विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग आठव्यांदा केला पाकिस्तानचा पराभव

WhatsApp Group

आयसीसी वनडे विश्वचषकातील 12 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला India vs Pakistan . टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने जिंकला. या विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. भारताच्या विजयात रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग 8व्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्याचवेळी भारताविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या विजयाचे पाकिस्तानचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. आता भारत 8-0 ने आघाडीवर आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत सर्वबाद 191 धावांवर आटोपला. या काळात शार्दुल ठाकूरशिवाय भारताच्या सर्व गोलंदाजांनी या सामन्यात विकेट घेतल्या. मात्र, शार्दुलने केवळ दोनच षटके टाकली. इतर गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येकाने प्रत्येकी दोन बळी घेतले. यामध्ये मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या नावाचा समावेश आहे. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. तर मोहम्मद रिझवानने 49 धावा केल्या.

टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध विजयासाठी 50 षटकांत फक्त 192 धावांची गरज होती. भारताने या लक्ष्याचा सहज पाठलाग केला आणि अवघ्या 30.3 षटकात 3 गडी गमावून 192 धावा केल्या. यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शुभमन गिलने भारताला दमदार सुरुवात करून दिली. गिल 11 चेंडूत 16 धावा करून बाद झाला असला तरी, रोहित शर्माने पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषकात केवळ 63 चेंडूत 86 धावा करत ऐतिहासिक खेळी खेळली. रोहित शर्माशिवाय श्रेयस अय्यरनेही अर्धशतक झळकावले. अय्यरने 62 चेंडूत 53 धावांची खेळी खेळली. भारतीय संघाला पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध १९ ऑक्टोबरला खेळायचा आहे.