IND VS PAK: क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी! 2026 मध्ये दोनदा रंगणार भारत-पाक ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा, वेळापत्रक आणि तारखा जाणून घ्या

WhatsApp Group

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील क्रिकेटचे सामने म्हणजे केवळ खेळ नसून ती एक भावना असते. मैदानावरील खेळाडूंचा उत्साह, चाहत्यांची धडधड आणि दोन्ही देशांमधील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर रंगणारा हा थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. सध्या दोन्ही संघ केवळ आयसीसी (ICC) आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येतात. याच मालिकेत आता २०२६ या वर्षात दोन मोठ्या जागतिक स्पर्धांमध्ये हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत.

१५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये टी-२० विश्वचषकाचा थरार

पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे. या स्पर्धेसाठी यजमान म्हणून भारताने थेट स्थान मिळवले आहे, तर पाकिस्तानने रँकिंगच्या जोरावर आपली जागा निश्चित केली आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारत आणि पाकिस्तानमधील हा सामना विश्वचषकाचे मुख्य आकर्षण ठरणार असून, संपूर्ण जगाचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे.

महिला टी-२० विश्वचषकातही रंगणार लढत

पुरुषांप्रमाणेच महिला क्रिकेटमध्येही भारत-पाकिस्तान संघर्ष पाहायला मिळणार आहे. जून २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये महिला टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात स्थान मिळाले आहे. या दोन्ही संघांमधील सामना १४ जून २०२६ रोजी रंगणार आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात भारताचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. आतापर्यंत झालेल्या १६ टी-२० सामन्यांपैकी १३ सामने भारतीय महिलांनी जिंकले आहेत, तर पाकिस्तानला केवळ ३ सामन्यांत विजय मिळवता आला आहे.

अंडर-१९ विश्वचषकातही शक्य आहे सामना

२०२६ मध्येच अंडर-१९ विश्वचषक स्पर्धाही पार पडणार आहे. सध्यातरी या स्पर्धेच्या साखळी फेरीत दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच हा सामना होणार नसला तरी, बाद फेरीत (सेमीफायनल किंवा फायनल) हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे. या सामन्याची अधिकृत तारीख अजून निश्चित झालेली नसली तरी, युवा खेळाडूंमधील हा संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यामुळे, क्रिकेट चाहत्यांनी आत्ताच आपल्या कॅलेंडरमध्ये या तारखा नोंदवून ठेवाव्यात, जेणेकरून हा थरार मिस होणार नाही.