
T20 विश्वचषकापूर्वी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात भारताने 6 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. भारताने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियन संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 180 धावाच करू शकला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो मोहम्मद शमी, त्याने एका षटकात चार धावा देऊन तीन महत्त्वाचे बळी घेतले.
187 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. 4.4 षटकात ऑस्ट्रेलियाने कोणतेही नुकसान न करता 50 धावा पूर्ण केल्या होत्या. मार्श अतिशय धोकादायक फलंदाजी करताना दिसला. मात्र, सहाव्या षटकात भुवनेश्वर कुमारने मार्शला बाद करून भारताला सुटकेचा नि:श्वास सोडला.
ऑस्ट्रेलियाने 64 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला थोडा आळा बसला. स्टीव्ह स्मिथला मोठे फटके खेळण्यात यश मिळाले नाही. बर्याच संघर्षानंतर स्मिथने 12 चेंडूत 11 धावा केल्या आणि तो चहलच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. मात्र, फिंचने एका टोकापासून आघाडी राखली आणि ऑस्ट्रेलियाची पकड सामन्यावर कायम राहिली.
India win a thriller!
They beat Australia by 6 runs during their warm-up fixture in Brisbane 👏 #T20WorldCup | Scorecard: https://t.co/w8aJnC5fTF pic.twitter.com/7A2cO5JpAc
— ICC (@ICC) October 17, 2022
फिंच एका टोकाला राहिला आणि त्याने 40 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. फिंचला मॅक्सवेलचीही चांगली साथ लाभली. मॅक्सवेलने खासकरून चहलला लक्ष्य केले. मॅक्सवेलने 16 चेंडूत 23 धावा केल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. भारताकडून केएल राहुलने 33 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी खेळली. भारताच्या मधल्या फळीला मात्र फारशी कामगिरी करता आली नाही. पण सूर्यकुमार यादवने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत 33 चेंडूत 50 धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकांच्या मोबदल्यात टीम इंडियाला 20 षटकात 7 विकेट गमावून 186 धावा करता आल्या.
ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने सर्वाधिक 4 बळी घेतले. स्टार्क, मॅक्सवेल आणि आगर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.