Video: मुसळधार पावसाने मुंबईत कहर, घाटकोपरमध्ये इमारत कोसळली, अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी

WhatsApp Group

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. मुंबई-पुण्यात गेल्या 24 तासांपासून अधूनमधून पाऊस पडत असून, त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईच्या काही भागात आजही पाऊस झाला. IMD नुसार, नैऋत्य मान्सून आज 25 जून रोजी मुंबई आणि दिल्लीत दाखल झाला आहे.

रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट

येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रविवारी पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारीही या जिल्ह्यांमध्ये हीच स्थिती राहणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईत पावसाच्या तडाख्यात घाटकोपर (पूर्व) येथील राजावाडी कॉलनीत इमारतीचा काही भाग कोसळला. याबाबत माहिती देताना बीएमसीने सांगितले की, काही रहिवासी इमारतीत अडकले आहेत. बचावकार्य सुरू आहे. सद्य:स्थितीत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही.

सीएम शिंदे यांनी कोस्टल रोडला दीली भेट 

मुंबईतील पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीतील कोस्टल रोडला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी येथील परिसराचा आढावा घेतला आणि पाणी साचण्याच्या कारणांची माहिती घेतली. पाणी तुंबणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मिलन सबवेवर पोहोचलेले सीएम शिंदे म्हणाले, “आज मी इथे मिलन सबवेवर आहे आणि काल 1 तासात सुमारे 70 मिमी पाऊस पडला, परंतु येथे पाण्याची साठवण टाकी बांधण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली नाही. फ्लडगेट देखील बसवण्यात आले आहे. पावसाळ्यात लोकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मी विभागाला निर्देश दिले आहेत.”

पुणे : सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले 

पुणे जिल्ह्यातील खेड शिवपूर परिसरात मुसळधार पावसामुळे पुणे सातारा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी वाहनचालकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्याचवेळी अनेक वाहने पाण्यात अडकली. पावसाळ्यापूर्वी कोणतीही पूर्वतयारी न केल्याने पहिल्याच पावसात महामार्ग प्रशासनाचे काम कोलमडले. त्यामुळे नागरिकांनी महामार्ग प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त केली आहे.