VIDEO: “मशीन सांगतेय तू बांगलादेशी आहेस”, गाझियाबाद पोलिसांचा अजब कारभार! पाठीवर मोबाईल ठेवून सुरू आहे ‘नागरिकता तपासणी
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांच्या कार्यपद्धतीचा एक अत्यंत विचित्र आणि चकित करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका पोलीस निरीक्षकाने (SHO) चक्क एका व्यक्तीच्या पाठीवर मोबाईल फोन ठेवून तो बांगलादेशी घुसखोर असल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून, नागरिकता तपासणीच्या या अजब ‘हायटेक’ पद्धतीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
काय आहे ‘मोबाईल तपासणी’चे प्रकरण?
व्हायरल झालेला हा व्हिडिओ कौशांबी पोलीस ठाण्यातील असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, २४ डिसेंबर रोजी पोलीस आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) परिसरात फ्लैग मार्च करत होते. यावेळी झुग्गी-झोपडी परिसरात तपासणी सुरू असताना काही लोक आपली ओळखपत्रे दाखवू शकले नाहीत. आपण बिहारचे रहिवासी असल्याचा दावा या लोकांनी केला. मात्र, कौशांबीचे पोलीस निरीक्षक अजय शर्मा यांनी संशय व्यक्त करत त्यांच्या पाठीवर आपला मोबाईल फोन ठेवला आणि म्हटले, “ही मशीन सांगतेय की तू बांगलादेशी आहेस!” पोलिसांच्या या अजब दाव्याने उपस्थित नागरिकही गोंधळून गेले.
UP: गाजियाबाद से एक वीडियो वायरल हुआ है, जिसमें SHO अजय शर्मा मोबाइल से नागरिकता बताने का दावा करते दिखे. उन्होंने एक युवक की पीठ पर फोन लगाकर उसे बांग्लादेशी बताया, जबकि युवक खुद को बिहार के अररिया का निवासी बता रहा था. वीडियो सामने आते ही SHO की कार्यशैली पर सवाल उठे.… pic.twitter.com/gDb8mfRAXD
— NDTV India (@ndtvindia) January 1, 2026
भीती दाखवण्याची पद्धत की अधिकारांचा गैरवापर?
सहसा पोलीस गुन्हेगारांकडून गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी विविध मनोवैज्ञानिक युक्त्या वापरतात. घुसखोरांना बोलतं करण्यासाठी कदाचित हा मार्ग अवलंबला असावा, असे काहींचे म्हणणे आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीची नागरिकता तपासण्यासाठी अशा प्रकारे मोबाईलचा वापर करणे हे बेजबाबदारपणाचे आणि मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे. पोलिसांना वाटले नव्हते की, त्यांचे हे ‘अनोखे’ तंत्र त्यांच्यासाठीच अडचणीचे ठरेल. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून गाझियाबाद पोलिसांची चांगलीच नाचक्की होत आहे.
सोशल मीडियावर टिकेची झोड आणि मीम्सचा पाऊस
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर टीकेचा पूर आला आहे. “भारताला नागरिकता तपासणीसाठी आता सॅटेलाईट किंवा कागदपत्रांची गरज नाही, गाझियाबाद पोलिसांचा मोबाईलच पुरेसा आहे,” अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टोले लगावले आहेत. काहींनी याला विनोद ठरवले आहे, तर काहींनी पोलिसांच्या कार्यशैलीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर गाझियाबाद पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा कारवाईचे वृत्त समोर आलेले नाही.
