गणेश मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू ? शिराळा तालुक्यात झाला चमत्कार.!

WhatsApp Group

सांगली जिल्हयातील शिराळा तालुक्यातील चिंचोली या गावातील जाधव नामक व्यक्तीच्या घरातील गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू (पाणी) येत आहे असा कथित चमत्कार घडला आहे असे समजते.सद्या महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा लागू असल्याने चमत्काराचा दावा करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे , तेव्हा असा खोटा दावा करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, प्रा. एस.के. माने यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.

अंनिसने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्याच्या विज्ञान युगात असे चमत्कार घडू शकत नाहीत. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते, ते कारण मानवी बुद्धीला समजते. अंनिस ने आपल्या प्रसिद्धी पत्रकात असे आवाहन केले आहे की, जाधव यांनी चमत्कार तपासणी करण्याची परवानगी दिली तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या चमत्कारा मागील कारण – विज्ञान लोकांना सांगू शकेल. जाधव यांना अंनिसचे आवाहन आहे की, कृपया चमत्काराची सत्यता पडताळण्यासाठी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीस सहकार्य करावे.

अंनिस चे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, “गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आहे. या कायद्याच्या कलम दोन नुसार “एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे; आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे.” हा दखलपात्र गुन्हा आहे. या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार त्या भागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे या कायद्याचे ‘दक्षता अधिकारी’ म्हणून काम करत असतात. या दक्षता अधिकाऱ्यांनी संबंधित चमत्काराची सत्यता पडताळून पहावी, तथाकथित चमत्कार घडवून दिशाभूल केली असल्यास संबंधितावर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही करत आहोत.”

महाराष्ट्रातील संतांनी समाजसुधारकांनी चमत्कारांच्या घटनांना विरोध केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत म्हणतात,
चमत्काराच्या भरी भरोनी ।
अनेकांची झाली धुळधानी ।
संत चमत्कार यापुढे ।
नका वर्णवू सज्जनहो ।।
तेव्हा बुद्धीच्या देवताच्या नावाने अशा चमत्कारांची अफवा पसरवणे हा त्या देवतांचा अपमानच नव्हे काय?

पुरोगामी विज्ञानवादी महाराष्ट्रात असे कथित चमत्कार दाखवून जनतेची दिशाभूल करणे हे अत्यंत निषेधार्थ आहे.अशा तथाकथित चमत्कारावर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन अंनिसच्या वतीने करीत आहोत.

– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सांगली जिल्हा