
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण रस्ता अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच देवदूत, आयआरबी, बोरघाट पोलीस आणि इतर यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर जखमींना बाहेर काढून नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खालापूर येथे झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, एर्टिगा कारने मागून दुसऱ्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या कारमध्ये एकूण 7 जण होते. यातील पाच जणांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत एक महिला थोडक्यात बचावल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही गंभीर जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघात रोखण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनांची 24 तास तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सोमवारी दिले. परिवहन आयुक्त भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण अधिक असल्याचे या बैठकीत उघड झाले आहे.