
महाराष्ट्र राज्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप २०२२ मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२२ असा आहे. शासनाच्या ई-पीक पाहणी मध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही ०१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होत आहे.
पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ही पिक पाहण्याची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पिक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते.अशा परिस्थितीत शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहतो. शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीक पाहणी मध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्यात येईल. असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभाग घेताना ई पीक पाहणी मध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही.
राज्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नसल्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे. खरीप-२०२२ मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिवस ३१ जुलै २०२२ आहे. pic.twitter.com/akMfaObhJq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 15, 2022
सदर शेतकरी पिक विमा बाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पिक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो मात्र ०१ ऑगस्ट, २०२२ नंतर त्यांनी ई-पीक पाहणी मध्ये आपल्या पिकाची नोंद करावी असे आवाहन करण्यात येत आहे. अशी माहिती कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी दिली आहे.