मशिदीवरचे भोंगे काढायला लावले तर यांची हातभर फाटली आणि बाबरी मशीद आम्ही पाडली असं सांगत सुटतात – देवेंद्र फडणवीस

WhatsApp Group

मुंबई – मशिदीवरचे भोंगे काढायला लावले तर यांची हातभर फाटली आणि बाबरी मशीद आम्ही पाडली, असं सगळीकडे सांगत सुटतात, अशा जहरी शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्व ही अशी व्याख्या आहे, की ज्या हिंदुत्वाने जीवनाचा मार्ग दाखवला. तुमच्या सरकारमधले मंत्री भ्रष्टाचार करुन जेलमध्ये गेले आहेत, म्हणूनच महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेलीय, असं म्हणत फडणवीसांनी आघाडी सरकारला लक्ष्य केलं.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, अयोध्येत मशीद होती, हे मी मानत नाही. तो ढाचा होता. हिंदू कधी मशीद पाडू शकत नाही. तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानाने सांगतो, आम्ही केलं आहे. तुम्ही आम्हाला विचारता, बाबरी पडली त्यावेळी तुम्ही कुठे होता…? मी अभिमानाने सांगतो, ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी मी त्याच ठिकाणी होतो. हा देवेंद्र फडणवीस बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी त्याठिकाणीच होता. एवढंच नव्हे तर राममंदिराच्या कारसेवेसाठी १८ दिवस बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये घालवले. लाठ्या-काठ्या खाण्याचे काम मी त्या ठिकाणी केलं.

“बाबरी पडली त्यावेळी महाराष्ट्रामधून एकही नेता तिथे गेला नव्हता. एकही शिवसैनिक तिथे हजर नव्हता. बाबरी मशीद पडली त्यावेळी कोणावर आरोप झाला?, त्यावेळी ३२ आरोपी होते, त्यात भाजप नेते लालकृष्ण आडवणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंगजी, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, रामविलास वेदांती…. आणि त्यातला एक आरोपी मंचावर आहे, ते म्हणजे जयभान सिंग पवय्या…या ३२ आरोपींमध्ये एकही शिवसेनेचा नेता नव्हता. आमचा दोष एवढाच आहे, आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही, अनुशासन तोडता येत नाही.

“राज्यात हनुमान चालीसा म्हटळे तर राजद्रोह होतो, राणा दाम्पत्याने सांगितळे की मुख्यमंत्र्यांच्या घरापुढे हनुमान चालीसा म्हणणार तर त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, हनुमान चालीसा म्हटल्याने रामाचं राज्य उलथवलं जाईल की की रावणाचे राज्य उलथवलं जाईल?, तुम्ही रामाच्या की रावणाच्या बाजूने ते स्पष्ट करा”, असंही फडणवीस म्हणाले.