
मुंबई – “आमच्या घरीच हनुमान चालिसा म्हणायची होती, तर चांगल्या भाषेत सांगायला हवे होते. निरोप धाडायला हवा होता. पण दादागिरी करुन याल तर आम्ही तुमची दादागिरी मोडून काढू, ती कशी मोडायची, हे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलंय”, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्याचा समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाचा हट्ट धरणाऱ्या राणा दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांनी जशास तसं उत्तर दिले आहे. पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी कार्डचं लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी राणा दाम्पत्यावर टीकास्त्र सोडले आहे.
आमच्याच घरामध्ये हनुमान चालिसा म्हणायची होती, तर नीट सांगायला हवं होतं. आम्हाला व्यवस्थित कळवायला हवं होतं. याअगोदरही खूप सारे पाहुणे मातोश्रीवर येऊन गेले आहेत.
बाळासाहेब, माँ नी त्यांचं स्वागत केलं. पाहुणे येती घरी, तोचि दिवाळी हे आम्हाला माहितीय. या उक्तीनुसार आम्ही तुमचं स्वागत केले असतं. पण दादागिरीच करुन यायची असेल तर ती कशी मोडून काढायची हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलंय, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्यावर तोफ डागली.
सध्या नवहिंदुत्ववादी, तकलादू हिंदुत्ववादी अशी एक जमात आली आहे. तुमचा भगवा श्रेष्ठ की आमचा भगवा श्रेष्ठ अशी स्पर्धा सुरू आहे. पण आमचं हिंदुत्व घंटाधारी नाहीय. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे, हे लक्षात ठेवा, असा इशारही त्यांनी राणा दाम्पत्याला दिला.
लवकरच मला जाहीर सभा घ्यायची आहे, त्या सभेत मला तकलादू नवहिंदुत्वाद्यांचा समाचार घ्यायचा आहे. त्यांचा एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावयचाय. मास्क काढून त्यांचा मला समाचार घ्यायचाय, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.