जिल्ह्यातील विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group

कोल्हापूर : कोल्हापूरची जनता विकासांच्या मुद्यांवर आग्रही असते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगून गेल्या दहा-अकरा महिन्यात शासनाने विविध विकास कामांसाठी जिल्ह्याला 762 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. कोल्हापूरकरांची अनेक वर्षापासूनची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी लवकरच मा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना भेटून विनंती करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन पंचगंगा प्रदूषण मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तपोवन मैदान येथे संपन्न झाला. यावेळी त्यांच्या हस्ते शासन योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देण्यात आले.

कार्यक्रमास पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, भारत गोगावले, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर व चंद्रदीप नरके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व विविध योजनांचा लाभ मिळालेले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले असून त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. भारत दर्शन अंतर्गत तीर्थक्षेत्र पर्यटन परिक्रमासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. सरकारी काम आणि सहा महिने थांब हा पायंडा खोडून काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे. सर्व योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन दूत म्हणून काम करीत आहे. एका छताखाली योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत अंमलात आणला जात आहे. त्याचवेळी योजनांच्या लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठीही सर्वसामान्य लोकांना खेटे घालावे लागू नयेत यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

लोकांचे जीवन सुखी, आनंदी आणि सुरक्षित करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण कल्याणकारी योजना शासन राबवित आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘लेक लाडकी लखपती’ ही योजना महिला व मुलींच्या विकासासाठी सुरु करण्यात आली आहे. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम स्थानावर असल्याचा अभिमान व्यक्त करुन 1 लाख 14 हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गत केंद्र शासन राबवित असलेल्या योजनेत महाराष्ट्र शासनाने आणखी सहा हजार रुपयांची वाढ केल्याने शेतकऱ्यांना आता 12 हजार रुपये मिळणार आहेत.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देता यावी यासाठी 1500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु आहे. मनरेगाच्या माध्यमातून गावांचा संपूर्ण कायापालट करण्यात येत आहे. गावांची समृद्धी आणि सर्व सामन्यांना न्याय हे शासनाचे धोरण आहे. राज्याच्या मागणीनुसार केंद्र शासन निधी उपलब्ध करुन देत असल्याबद्दल त्यांनी केंद्र शासनाचे आभार व्यक्त केले.

शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार असल्याने शासन आपल्या दारी या उपक्रमातून शासन, प्रशासन आणि जनता यांच्यामधील अंतर कमी होत आहे. शासन आता थेट आपल्या योजना लाभार्थ्यांपर्यंत घेवून जात आहे, हे या उपक्रमाचे यश आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे, असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

लयभारी! कोल्हापूरकरांनो… राम राम कसे आहात, बरे आहात ना, अशा अस्सल रांगड्या शब्दात कोल्हापूरकरांचे अभिवादन करुन मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरकरांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जनसमुदायाने गर्दीचा उच्चांक मोडून व्यक्त केलेल्या अलोट प्रेमाबद्दल त्यांनी कोल्हापूर जिल्हावासियांची आभार मानले.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी एक विशेष बैठक घेऊन निधी उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेंडा पार्क येथे मोठी जागा असून ही जागा विकसित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात मिळावी, कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, रंकाळा तलाव, पंचगंगा प्रदूषण याबरोबरच  महापालिका नवीन इमारतीसाठी १६० कोटींचा निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली. छत्रपतींच्या वैभवाची ओळख असणारे कोल्हापूर पुन्हा एकदा तेजाने तळपावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनव कल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्यात राबविला जात आहे. या उपक्रमातून शासनाच्या योजनांचा थेट लाभ लाभार्थीला मिळवून देण्यासाठी  शासन व प्रशासन  गतीने काम करीत आहे. गेल्या दहा-अकरा महिन्यात राज्य शासनाने लोक हिताच्या योजनांना  प्राधान्य दिले आहे. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी  निधीही वाढवून दिला आहे असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाने लोकोपयोगी निर्णय घेण्याचा धडाका सुरु केला असून आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ व कंत्राटी ग्रामसेवकांना 16 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाने आपले सर्व निर्णय शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सामान्य माणसाच्या हिताचे घेतले असल्याचे सांगितले. तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने विविध योजना राबविल्या जात आहेत. कोल्हापूर येथील एमआयडीसीचा येत्या सहा महिन्यांत विस्तार करण्यात येईल. तसेच तालुकास्तरावर ही एमआयडीसी सुरू करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. लघु उद्योगांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी असल्याने  या पुढील काळात एमआयडीसीचा विकास करताना त्यामधील १५ टक्के जागा लघु उद्योगांसाठी राखून ठेवण्याचा  निर्णय घेण्यात येत आहे. कोल्हापूरमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 100 कोटी रुपये एमआयडीसीला मंजूर करण्यात आले आहेत असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

श्री. क्षीरसागर म्हणाले, राज्य शासनाने सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. केवळ योजना  आणून न थांबता त्या योजना शासन आपल्या दारी या उपक्रमातून घरोघरी-दारोदारी घेऊन जात आहे. या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने मोठे काम केले आहे. याबद्दल त्यांनी प्रशासनाचे आभार मानले.

खासदार श्री. माने म्हणाले, महापुरूषांच्या विचाराने चालणारे शासन आहे. योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजना दूत म्हणून सर्वजण एकत्र येऊन आम्ही काम करत आहोत. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या प्रत्येक लाभार्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते हेच शासन आपल्या दारी उपक्रमाचे यश आहे असे ते म्हणाले. खासदार श्री. मंडलिक यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी आजचा दिन हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी सोनियाचा दिन असल्याचे सांगितले. शासन आपल्या दारी या उपक्रमातून शासनाच्या विविध योजना प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत पोहोचत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याने १ लाख ५८ हजार लाभार्थीना विविध योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले असल्याचे त्यांनी सांगितले. विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी कोल्हापूर जिल्ह्यासआणखी उद्दिष्ट मिळाल्यास ते निश्चित पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिले.  शासन योजनांचा लाभ  देण्यासाठी कोल्हापूर येथे  आयोजित केलेला हा कार्यक्रम नव्या युगाची व वेगाची नांदी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे समन्वयक अमोल शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात  दिव्यांग  विद्यार्थी लाभार्थ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. मध, गुळ, चटणी, भडंग, नृसिंहवाडीचा पेढा अशी कोल्हापूरची शिदोरी देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर लाभार्थ्यांना बसण्याची संधी हे या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ठ्य ठरले. कागल तालुक्यातील सादीक गुलाब मकुभाई यांच्या नवजात कन्येला मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारांसाठी लाख मोलाची मदत केल्याबद्दल या कुटुंबाने मुख्यमंत्री शिंदे यांना आभार पत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आभार मानले.