चंद्रकांत पाटील, नारायण राणे हे सरकार पाडण्याच्या तारखांवर तारखा देतात, ते आम्ही एन्जॉय करतो – शरद पवार

नांदेड – राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने तीनही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बसून निर्णय घेतील. परंतु, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे तर पूर्ण करणारच परंतु, पुढील पाच वर्षे सत्तेत राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
शरद पवार हे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पहिल्यांदाच देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यात केंद्राचा इंधनावरील कर सर्वाधिक असून तो कमी करण्याची गरज आहे.
अत्यावश्यक वस्तूंच्या किमती, महागाई वेळीच रोखली नाही तर त्याचे परिणाम वेगळे असतील, असंही पवार म्हणाले. भाजपचे चंद्रकांत पाटील, नारायण राणे हे सरकार पाडण्याच्या तारखांवर तारखा देतात. ते आम्ही एन्जॉय करतो, अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी बोलताना केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे आगामी निवडणुका एकत्र लढायच्या की वेगवेगळ्या, या अनुषंगाने येत्या पंधरा दिवसांत निर्णय होईल. वेगवेगळे लढून नंतर एकत्र येणे अथवा एकत्रित मिळून लढणे. त्यावर प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, असंही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.