संभाजी भिडे विरुद्ध पुण्याच्या न्यायालयात केस दाखल

WhatsApp Group

महात्मा गांधी, क्रांतीज्योती महात्मा फुले आणि इतर अनेक राष्ट्रपुरुष, विचारवंत यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे याच्या विरोधात आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी केस दाखल करण्यात आली. २७ जुलै 2023 रोजी अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात संभाजी भिडे गुरुजी याने महात्मा गांधी व त्यांच्या परिवारातील स्त्रीयांबद्दल तसेच संपूर्ण महात्मा गांधी वंशावळी बद्दल बदनामी करणारे वक्तव्य केले असा आरोप न्यायालयात दाखल केसमध्ये करण्यात आलेला आहे.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. विश्वंभर चौधरी, डॉ. मेधा सामंत, अन्वर राजन,प्रशांत कोठडीया, संकेत मुनोत,जांबुवंत मनोहर आणि युवराज शाह अशा 9 जणांनी जनतेचे प्रतिनिधी म्हणून ही तक्रार ॲड. असीम सरोदे, ॲड श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर,ॲड.बेनझीर कोठावाला व ॲड.अवंती जायले यांच्या मार्फत कलम १५६(३) सीआरपीसी नुसार खाजगी फौजदारी तक्रार पुण्यातील न्यायालयात दाखल केली आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९, १५३ अ, ५०४, ५०५(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ r/w १९९ Cr.P.C. नुसार संभाजी भिडे विरुद्ध चौकशी होऊन गुन्हा नोंदवावा अशी मागणी केसमधून करण्यात आलेली आहे. दि.०१/०८/२०२३ रोजी डेक्कन पोलीस स्टेशनला तक्रार करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही व पोलिसांवर राजकीय दबाव आहेत त्यामुळे संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हे अनियंत्रित व बेताल वक्तव्ये करतात असे तक्रारदार तुषार गांधी म्हणाले.

डेक्कन पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर तसेच पोलिस आयुक्त यांनी दखलपात्र सायबर बदनामी गुन्ह्यांची माहिती देऊनही साधी चौकशीही केली नाही व त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान केला असल्याने याची न्यायिक दखल घ्यावी अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आलेली आहे अशी माहिती डॉ विश्वमभर चौधरी यांनी दिली. संभाजी उर्फ मनोहर भिडे आणि त्यांचे अनेक कार्यकर्ते ही सतत राष्ट्रीय आणि धार्मिक व्यक्तिमत्वांचा अपमान करत असतात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करण्यात पुढाकार घेतात, संभाजी भिडे यांनी त्यांच्या अनेक भाषणात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरून समाजातील अनेक लोकांचा व देशाचा अपमान करत असतात याची उदाहरणे तक्रारीत नमूद केली आहेत.

एकीकडे जागतिक स्तरावरील नेत्यांना राजघाटवर महात्मा गांधींच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी आपले पंतप्रधान घेऊन जातात व दुसरीकडे संभाजी भिडे सारखे लोक ताळतंत्र न बाळगता सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतात ,सतत समाजात विष पसरविणारी विधाने करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात निदान पोलिसांनी कारवाई करावी ही माफक अपेक्षा नागरिकांनी या तक्रारीतून व्यक्त केली आहे अशी माहिती तक्रारदारांचे वकील ॲड.असीम सरोदे यांनी दिली. या केसची पुढील सुनावणी येत्या 26 सप्टेंबर ला होणार आहे.