मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमच्याकडे बाळासाहेब थोरात यांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही, असं म्हटलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या परस्पर गटबाजी शिगेला पोहोचली आहे. राज्यातील महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या नाना पटोले यांच्या निषेधाचे आवाज उठू लागले आहेत. यामध्ये सर्वात मोठे नाव आहे ते महाराष्ट्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडला पत्र लिहून नाना पटोले यांच्याबाबत तक्रार केली आहे. आता नाना पटोले यांच्यासोबत पक्षात काम करणे कठीण होत असल्याचेही त्यांनी पत्रात लिहिले आहे. खरे तर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर पटोले यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल केला आहे.
या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून पक्षाविरोधात बंडखोरी केली. याची तक्रार दिल्लीतील पक्षप्रमुखांकडे गेली. सुधीर तांबे यांच्यासह सत्यजित तांबे आणि त्यांच्या वडिलांनाही पक्षाने निलंबित केले आहे. बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले पटोले अनेकांना मागे टाकून महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवत आहेत.
दरम्यान नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, महाराष्ट्र काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. फडणवीसांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर आणि अमरावती या दोन जागा जिंकल्या आहेत. ही भाजपची नाराजी आहे. त्यामुळे भाजप अशा अफवा पसरवत आहे. आमच्या पक्षात असा कोणताही वाद नाही. नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात असा संघर्ष सुरू नाही.
काँग्रेस नेत्या हेमलता पाटील यांनी ट्विट करून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खरोखरच दोन गट पडले आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला आहे, त्यापैकी एक नाना पटोले आणि दुसरा बाळासाहेब थोरात यांचा आहे. हेमलता पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, आज सकाळी सकाळी फोन आला “ताई आपण बाळासाहेबांच्या कॉंग्रेस चे काम करायचे की नानांच्या कॉंग्रेसचे?”आता काय उत्तर देऊ कप्पाळ?
आज सकाळी सकाळी फोन आला “ताई आपण बाळासाहेबांच्या कॉंग्रेस चे काम करायचे की नानांच्या कॉंग्रेस चे?”आता काय उत्तर देऊ कप्पाळ?
— DR HEMLATA PATIL (@DRHEMLATA3) February 5, 2023
बाळासाहेब थोरात म्हणाले…
बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानपरिषद निवडणुकीवेळी अपमानास्पद गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. कुटुंबाविरुद्ध जाहीर वक्तव्ये करण्यात आली. वाद संपण्याऐवजी त्यात वाढ करण्यात आली आणि अनेक कार्यकर्त्यांवर कारवाईही झाली. पक्षाच्या बैठकांमध्येही खालच्या स्तरावर वक्तव्ये झाली. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना त्रास देऊन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
