मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर जाळपोळ करण्याचा प्रयत्न

WhatsApp Group

मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर झाली आहे. मेईती समाजातील दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. गुरुवारी संतप्त आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये अनेक ठिकाणी चकमक झाली. दरम्यान, संतप्त जमावाने इंफाळमधील मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानाकडे मोर्चा काढण्यासाठी इंफाळ पूर्वेतील हँगिंग भागात मोठ्या संख्येने आंदोलक जमले. मात्र सुरक्षा दलांनी त्यांना रोखले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इंफाळमधील हँगिंग येथील मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुरक्षा दलांनी आंदोलकांना निवासस्थानापूर्वी सुमारे 100 मीटर अंतरावर रोखले.

जातीय तणावात भाजपच्या कार्यालयावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जून महिन्यात थोबाल जिल्ह्यातील भाजपच्या तीन कार्यालयांची तोडफोड करण्यात आली होती. यावेळी जमावाने कार्यालयाचे गेट, खिडक्या आणि आवारात उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडल्या.

बेपत्ता विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रकरण काय?

6 जुलैपासून बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या हत्येविरोधात स्थानिक लोकांनी निदर्शने केली. दरम्यान, मंगळवारी रात्री स्थानिक आंदोलक आणि आरएएफ सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेत 45 जण जखमी झाले असून यातील बहुतांश विद्यार्थी आहेत.

दोन्ही विद्यार्थ्यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयचे संचालक अजय भटनागर बुधवारी आपल्या टीमसह इम्फाळला पोहोचले. मुख्यमंत्री बिरेन सिंग या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सतत संपर्कात आहेत.

राज्यातील संभाव्य निदर्शने आणि हिंसाचाराचा सामना करण्यासाठी मणिपूर पोलीस, CRPF आणि RAF चे जवान इम्फाळ खोऱ्यात तैनात आहेत. कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरे जाण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारने 27 आणि 29 सप्टेंबर रोजी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील संघर्षानंतर सरकारने तत्काळ प्रभावाने इंटरनेट मोबाइल सेवांवर बंदी घातली. ही बंदी 1 ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे.

मात्र, सरकारने औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी लक्षात घेऊन कर्फ्यूचे निर्बंध शिथिल केले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मेईतेईच्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांची छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर मंगळवारी इंफाळमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली होती. यानंतर मणिपूर सरकारने राज्यातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्याचे आदेश दिले.

6 जुलैपासून बेपत्ता झालेल्या मणिपूरमधील दोन विद्यार्थ्यांचे फोटो मंगळवारी व्हायरल झाले होते. चित्रांमध्ये, विद्यार्थी जमिनीवर बसलेले दाखवले आहेत, तर त्यांच्या मागे दोन सशस्त्र पुरुष दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका छायाचित्रात दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह दिसत आहेत. 17 वर्षीय हिजाम लिंथोइंगम्बी आणि 20 वर्षीय फिजाम हेमजीत अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.