
अनुभवी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) टी-20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भारतीय संघ 2021 च्या टी-20 विश्वचषकाप्रमाणे सहजासहजी हार मानणार नसून पाकिस्तानसमोर कडवे आव्हान उभं करेल, असं त्याने म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ भिडणार आहेत. 24 ऑक्टोबर रोजी दोन्ही संघ आमनेसामने येतील आणि त्यानंतर त्यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळेल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
गेल्या वेळी दोन्ही संघांमधील सामन्यामध्ये पाकिस्तानने भारताचा मोठ्या सहजतेने पराभव केला होता. पाकिस्तानच्या संघाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला आणि विश्वचषकातील कोणत्याही सामन्यात भारताला प्रथमच पराभूत करण्याचा पराक्रम केला. मात्र, यावेळी पाकिस्तान संघाला भारताकडून कडवे आव्हान मिळेल आणि भारतीय संघ सहजासहजी हार मानणार नाही, असा विश्वास शोएब अख्तरकडून व्यक्त करण्यात आला आहे.