कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी 500 कोटी; मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group

रायगड: कोकणची भरभराट झाली पाहिजे, बाहेर गेलेला कोकणचा युवक पुन्हा इकडे आला पाहिजे, यासाठी प्रयत्नशील आहे.  कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी २० हजार कोटींचा नवा उद्योग येत आहे. कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटीची तरतूद केली असून माणगाव नगरपरिषद बांधकामासाठी १५ कोटी, पावनखिंडीला जाणाऱ्यांच्या विश्रामधामासाठी १५ कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच शासन आपल्या दारी कार्यक्रमातून आत्तापर्यंत २ कोटी १ लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील २६ लाख लाभार्थींना १७०० कोटींचे लाभ दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कुलगुरु प्रा. डॉ. कारभारी काळे उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप करण्यात आले. तळीये दुर्घटनाग्रस्तांना घरांच्या चाव्या मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आल्या. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणालीचे लोकार्पणही यावेळी झाले. शासन आपल्या दारी कार्यक्रमातर्गत आयोजित आरोग्य शिबिर, कृषी प्रदर्शन तसेच औद्योगिक कंपनी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य कारभार पुढे नेत आहोत. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. ‘शासन आपल्या दारी’ हा छत्रपती शिवरायांना आणि डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या लोकशाहीचा एक अत्यंत लोकाभिमुख असा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात खेटा माराव्या लागत नाही. सरकार जनतेच्या दारात येऊन त्यांची कामं करतंय. शासन आपल्या दारी उपक्रमाचा हा 20 वा कार्यक्रम आहे. आत्तापर्यंत 2 कोटी 1 लाख 91 हजार 803 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. ‘निर्णय वेगवान गतिमान सरकार’ अशा पध्दतीने कामकाज सुरु असल्याचे सांगून, कोकणच्या विकासासाठी जे आवश्यक आहे, ते करु, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

रायगड सुशासनाची राजधानी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रायगड  ही सुशासनाची राजधानी आहे. शौर्य, स्थैर्य आणि सामर्थ्य या त्रिसुत्रीचा मूलमंत्र येथे मिळतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी म्हणून रायगडकडे आपण पाहतो. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले, त्याप्रमाणे प्रजेकरिता राजा, प्रजेचा सेवक म्हणून राजा, प्रजेच्या सेवेसाठी प्रशासन हाच भाव ठेवून मुख्यमंत्री काम करीत आहेत. त्याचं निर्धाराने  ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवत आहेत.

कमी कालावधीत जिल्ह्यात 26 लाख लाभार्थ्यांना 1700 कोटींपेक्षा जास्त लाभ लाभार्थ्यांना मिळाला आहे. लाभासाठी एकाही  लाभार्थ्यांला चक्कर मारावी लागली नाही. थेट दारामध्ये लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. पुढची 25 वर्षे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र रायगड जिल्हा हा असणार आहे. आधुनिक जगात डेटा सर्वात महत्त्वाचा आहे. डेटाची किंमत तेलापेक्षाही जास्त झाली आहे. डेटाच्या विकासाचा केंद्रबिंदू हा रायगड जिल्हा असणार आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा होत आहेत. मोठ्या प्रमाणात या भागात गुंतवणूक आलेली पहायला मिळणार आहे. रायगडचे चित्र आपण कामातून बदलतोय. एक रुपयात विमा, नमो शेतकरी सन्मान योजना, शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी ६ हजार मदत अशा अनेक योजना सुरु केल्या आहेत. देशाला पुढे न्यायचे असेल तर महिलांचे सक्षमीकरण व्हायला हवे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात. त्यातूनच नव्या महिला धोरणातून त्यांचे सक्षमीकरण करतोय, असेही देवेंद्र  फडणवीस यांनी यावेळी सांगितले.