कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 3 जवान शहीद, लष्कराची शोध मोहीम सुरूच

WhatsApp Group

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 3 जवान शहीद झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हालान जंगल परिसरात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीनगरस्थित लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘ऑपरेशन हलन कुलगाम. कुलगाममधील हालानच्या उंच भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी 4 ऑगस्ट रोजी कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आणि नंतर ते शहीद झाले. शोधमोहीम सुरू आहे.लष्कर अधिकाऱ्याने सांगितले की, चकमकीच्या ठिकाणी आणखी फौजा पाठवण्यात आल्या असून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक अशा वेळी होत आहे, जेव्हा आज 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याला 4 वर्षे पूर्ण होत आहेत. यावेळी भाजपने श्रीनगरमध्ये विजयी पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. सकाळी 9.30 वाजता नेहरू पार्क येथून निघणारी ही विजयी पदयात्रा शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरपर्यंत जाईल. त्याचवेळी खबरदारी म्हणून शनिवारी (5 ऑगस्ट) होणारी अमरनाथ यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे.

यापूर्वी, काश्मीरमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची शाखा ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला येथील इम्रान अहमद नजर, श्रीनगर येथील वसीम अहमद मट्टा आणि बिजबेहारा येथील वकील अहमद भट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, तिघांनाही पोलीस पथकाने विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे चेक पोस्टवरून पकडले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन हातबॉम्ब, 10 राउंड पिस्तूल, 25 एके-47 रायफल आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.