शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला जमा होणार PM Kisan सन्मान निधी योजनेचा 12वा हप्ता

पीएम किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याचे पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत. हे पैसे सप्टेंबरपर्यंत हस्तांतरित करता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 31 मे रोजी पीएम मोदींनी 11 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. त्यानंतर केवायसी करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली. पण आता खात्यात 12 वा हप्ता कधी येणार याची माहिती समोर येत आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दोन हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देते. शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 6 हजार रुपये दिले जातात.
पीएम किसान योजनेच्या 12व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान खात्यात 2,000 रुपये ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकार 1 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 12 वा हप्ता हस्तांतरित करू शकते. सरकारने केवायसीची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत वाढवली आहे.
31 जुलैनंतर ई-केवायसीची तारीख वाढवण्यात आलेली नाही. ई-केवायसीची अंतिम तारीख 31 जुलैपर्यंत होती. सरकारच्या म्हणण्यानुसार, ज्यांनी केवायसी केलेले नाही, ते या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.
जर तुम्हाला ई-केवायसी अपडेट झाले असेल आणि त्यानंतरही किसान सन्मान निधीचे पैसे तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत, तर यामागे आणखी काही कारणे असू शकतात. हे देखील तपासणे महत्वाचे आहे. यापैकी कोणतीही चूक असल्यास पुढील हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. असे झाल्यास तुम्हाला आधार सेवा केंद्रात जाऊन चूक सुधारावी लागेल.